जग‍द्‌गुरू संत श्री ज्ञानेश्वर महाराज व त्यांची भावंडे ही चालती बोलती ज्ञानपीठेच होती. “ज्ञान ज्या ठिकाणी गंगौघासारखे स्वच्छ, सुंदर व अफाट अन् मुक्तपणे उपलब्ध असेल; ते ज्ञानपीठ खऱ्या अर्थाने त्यांचे सर्वांगसुंदर व उचित स्मारक ठरेल. तत्वज्ञान व संत वाङ्गमय शिकण्याची व त्याद्वारे आत्मोद्धार करून घेण्याची कळकळ असणारे साधक व त्यांना निरहंकारी व मुमुक्षुत्वाने ज्ञान देण्याची इच्छा असणारे ज्येष्ठ अभ्यासक यांच्यासाठी हे चिंतनाचे समग्र व्यासपीठ असेल. जगातील सर्व धर्म संप्रदायांचे व तत्वज्ञानाच्या विविध प्रणालींचे हवे ते शिक्षण तसेच वैदिक व संत साहित्य ही प्रधान आस ठेवून, त्या साहित्याच्या अनुषंगाने शिक्षण घेण्यासाठी या ज्ञानपीठाची स्थापना करण्यात आली आहे.” हे ज्ञानपीठ ही आदर्श, उन्मुक्त अशी आधुनिक संस्कृती ठरावी!सारग्राही वृत्तीने व दृष्टीने सर्व धर्म आत्मतत्वाकडेच जाणारे असून, ते एकाच परमतत्वाची वैविध्यपूर्ण अंगे आहेत, हे लक्षात घेऊन, ज्यास जे रूचेल, भावेल ते समजावून घेऊन आचरण करणे; हा सर्वांचा मूलभूत व ईश्वरदत्त जन्मसिद्ध हक्क जपण्यासाठी हे ज्ञानपीठ कार्यरत असेल.

संकल्पित प्रमुख उद्दिष्टे

१)  सर्व विषय प्रामुख्याने संतवाङ्गमय, वेद, वेदांगे, पुराणे, उपनिषदे, विद्या, कला तसेच हिंदू धर्मातील अव्दैत तत्वज्ञान, आद्य शंकराचार्य व श्री ज्ञानेश्वर माउली यांचे समग्र वाङ्गमय, श्रीदासबोध, श्रीभगवद्‍गीता, श्रीएकनाथी भागवत , विश्वकोश तसेच श्रीदत्तसंप्रदाय, श्रीनाथसंप्रदाय याबद्दलची समग्र हस्तलिखिते व पुस्तके एकत्र करणे, त्यांचे योग्य जतन करणे. तसेच श्रीसंत निवृत्तिनाथ महाराज ग्रंथालयात त्यांचे Digitization करून Digitized e-Library चे निर्माण करणे.

   * अभ्यासकांना श्रीसंत निवृत्तिनाथ महाराज ग्रंथालय, आळंदी येथे e-Library इंट्रानेट द्वारे पहिल्या टप्यात उपलब्ध करून देणे.

   * कालांतराने विश्वभरातील अभ्यासकांना e-Library इंटरनेट सुविधेने उपलब्ध करून देणे.

२)  जगभरातील समस्त ई-लायब्ररीज् आपलया ई-लायब्ररीला जोडून माहितीचा जो दुर्मिळ साठा जगभरात अनेकविध ठिकाणी पसरला आहे, तो एका क्लिकवर , एका पोर्टलवर समस्त साधकांना व अभ्यासकांना सहजतेने व नाममात्र मोबदल्यात उपलब्ध करून देणे.

3)  संस्थेमध्ये प्रामुख्याने संतवाङ्गमय संशोधन व तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी विविध तज्ञांकडून शिक्षण व संशोधन प्रकल्प हाती घेणे. ज्याला जे संतवाङ्गमय शिकण्याची इच्छा असेल, ते शिकता यावे; या दृष्टीने विविध विषय शिकवण्यात येतील. तसेच हिंदुधर्मातील स्तोत्रे, सूक्ते, पवमान, रुद्रपठण, इ. तसेच प्रामुख्याने श्रीदासबोध, श्रीगीता, श्रीएकनाथी भागवत, श्रीज्ञानेश्वरी, श्रीयोगवासिष्ठ या ग्रंथांवर अभ्यासवर्ग घेण्यात येतील. त्याच्यावर परीक्षा आयोजित करून प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच विविध डिप्लोमा, डिग्री अभ्यासक्रम पण आयोजित केले जातील.

४)  संतांची शिकवण, प्रचार व प्रसार करण्यासाठी विविध गावी तत्वज्ञान व संत साहित्य अभ्यासकांची व्याख्याने/प्रवचने/ वासंतिक वर्ग/ शिबिरे आयोजित करण्यात येतील.

५)  ज्ञानपीठातील विविध संशोधनाव्दारे सिध्द होणारे अभ्यासपूर्ण ग्रंथ प्रकाशित केले जातील. तसेच संत संदेश घरोघरी पोचवण्यासाठी संतवाङ्गमय अल्प किंमतीत उपलब्ध करून दिले जाईल.

६)  संतवाङ्गमयाचा प्रचार व प्रसार करणाऱ्या कीर्तनकार व प्रवचनकार यांचा यथोचित सत्कार करणे.

७)  अध्यात्मिक कीर्तने व प्रवचने यांचे ऑडिओ व व्हिडीओ रेकॉर्डिंग्स जतन करून अभ्यासकांना उपलब्ध करून देणे.

८)  वारकरी, नारदीय कीर्तन, प्रवचन यांचे शिक्षण व गुरुकुल पध्दतीचे शिक्षण व संवर्धन करणे.

९) कालमान बदलानुसार संस्थेचा सुयोग्य प्रचार व प्रसिध्दी होणे, यासाठी अध्यात्म/ तत्वज्ञान/ संशोधन/ संत संप्रदाय/ वारकरी संप्रदायातील मार्गदर्शक तसेच सामाजिक काम करणाऱ्या संस्थाचालकांना संस्थेत आणून संस्थेच्या कार्याचा समग्र परिचय करून देणे व संस्थेच्या पुढील कार्यासाठी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेणे.

संस्थेत येण्यासाठी गुगल नकाशा

इंद्रियांशी खेळणे म्हणजे साक्षात अग्नीशी खेळणे आहे.
असे जर इंद्रियांशी खेळलात, तर ती तुमचा सर्वनाश करतील. जर या इंद्रियांवर ताबा हवा असेल व त्या भगवंतांजवळ जायचे असेल, तर सद्‍गुरूंना शरण जाण्याशिवाय दुसरा मार्ग नाही.

आपले कुठल्याही गोष्टींकडे दुर्लक्ष जरी झाले,तरी श्रीभगवंतच आपल्याला सांभाळून घेतात. ते आपल्याला कमीपणा येऊन देत नाहीत; कारण आपण त्यांचे नाम घेतोय ना? त्यांना तेच तर हवे असते. म्हणूनच कोठल्याही परिस्थितीत नामस्मरण सोडू नये.

शांतपणे कर्मांचा उपभोग न घेणे
हे घातक ठरणारे असते.
पण तोच अलिप्तपणा जमला पाहिजे .

जितका साधनेचा निर्णय आपण पुढे ढकलू तितका आयुष्यातील वेळ वाया जात जाईल आणि आयुष्याच्या
शेवटी श्रीभगवंत काही भेटणार नाहीत. मग शेवटी त्यांचे नाम आठवणार नाही किंवा रूपही आठवणार नाही.

साधना जेव्हा मिळते तेव्हा; आपण जर लक्षात ठेवले असेल तर; असे आठवेल की, सद्‍गुरूंनी वेगळेच सांगितलेले असते आणि आपण मात्र ते ऐकूनही तिसरेच करत असतो.
शिवाय वर त्यांनाच विचारत असतो की; अहो आम्हांला अनुभव कसा नाही?

एक लक्षात ठेवा; कधीही, कितीही, कशीही कर्मे पुढे आली तरी ती नि:स्पृहपणे करायचा प्रयत्न करावा. शिवाय त्याच्यात दुसऱ्याला बुडवायचा चुकून सुद्धा विचार करू नये. जेवढा बुडवायचा विचार येईल, त्याच्या शंभर पटींनी भरावे लागेल हे लक्षात ठेवावे.

आपल्या प्रत्येक कृतीमध्ये असे काही तरी
असावे की, जे श्रीभगवंतांना पोहचले पाहिजे.
.... आणि असे विचार येऊ लागले की समाजावे,
आपण अगदी योग्य दिशेला चाललो आहोत!

हरिभजनाला, नामस्मरणाला उशीर करण्यात काही अर्थ नाही. जेवढा उशीर कराल, तेवढे आयुष्य हातातून निघून गेले असे समजायचे. म्हणून आपला एकही क्षण वाया जाणार नाही असा कसोशीने प्रयत्न तरी करायचा; म्हणजे निदान एक क्षण तरी मुखी नाम येईल.

भाव हा नुसता येऊन भागत नाही, तर तो रुजावा लागतो.
तोही असा; की वाटेल ते झाले तरी माझे
सद्‍गुरूच बरोबर,श्रीभगवंतच बरोबर! त्यांनी सांगीतलेले वेद गीता हेच बरोबर!

सद्‍गुरूंचा विश्वास निर्माण व्हावा, ह्यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते. त्यांनी सांगितलेले नीट ऐकून मनापासून करावे लागते; आणि शिवाय ते आपले म्हणून करावे लागते !

एखादी गोष्ट जर सोडायची असेल तर ते इतके सोपे नसते. आपण सोडू सोडू असे नुसते म्हणतो; मात्र ते सुटत नाही. पण जर कोणी दणका घातला तर मात्र ते लगेच सुटते. हा दणका कोण घालते? तर ते सद्‍गुरु घालतात; बरोबर योग्य वेळी घालतात. असा दणका मिळाला की, ती गोष्ट जागच्या जागी सुटते.

कुठल्या रूपाने श्रीभगवंत समोर येतील, माहित नाही! म्हणून समोर आलेल्या प्रत्येकाशी चांगलेच वागावे, नीटच वागावे. येणाऱ्याचे स्वागतच करावे; आपण अगदी त्याला ओळखत असलो तरी सुद्धा!

संसार हा एकाच गोष्टीसाठी चांगला; की संसार करता करताच सगळ्या परीक्षा होऊन जातात. मग परमार्थासाठी वेगळया परीक्षांना बसायची जरुरी नसते.

श्रीभगवंतांचे अनुसंधान, त्यांचे नामसंकीर्तन हे केवळ त्यांच्यासाठीच व्हायला हवे. त्यांच्याशिवाय त्यात इतर काहीही, एवढेसेही यायला नको. नाही तर आपले 'मी-माझे' सुटणारच नाही.

सद्‍गुरूंवर, श्रीभगवंतांवर पूर्णत्वाने सगळे सोपवले पाहिजे,पूर्ण शरणागती पत्करली पाहिजे. मग भले कितीही वाईट प्रसंग आले तरी चालतील; कितीही चांगले प्रसंग आले तरी चालतील. आणि हे जर जमले; तरच त्या प्रेमाचा वसंतोत्सव अनुभवता येईल.

श्रीसद्‍गुरुंचे आपल्याकडे सतत लक्ष असतेच;
आपलेच त्यांच्याकडे लक्ष नसते.
प्रसंगांनीच आपल्याला त्यांच्या वात्सल्यमय पांघरुणाची जाणीव होत असते.

आपल्याला शुध्द सत्संग साधायचा आहे;
प्रत्येक क्षणाला तो मिळवायचा आहे.
"आपल्या आयुष्याचे पहिले ध्येय तेच असले पाहिजे; मग बाकीचे सगळे !"
असे जर निश्चयाने ठरवले, तरच ते साधेल.

Slider